तसं बघायला गेलं तर गोष्ट आहे इंद्र सुखात्मेची, पण ही त्याची एकट्याची गोष्ट नाही, सर्वांची आहे. आणि या सर्वांमध्ये आपण - प्रेक्षकही येतो. इंद्रला बारावीत ९० % मार्क आहेत पण ऍडमिशन ९१ % लाच थांबली आहे. याच काळात अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू आहे, ते आपल्याला दिसतं फक्त टीव्हीच्या माध्यमातून. घरात रोजचं जगणं चालू असताना आंदोलन पार्श्वभूमीमध्ये नेहेमीच असतं पण चित्रपट वेग घ्यायला लागतो तसा आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न पडायला लागतात. प्रेक्षकांना हे प्रश्न पडणं ही 'हा भारत माझा' या चित्रपटाची खासियत आहे.
ही गोष्ट सांगण्यासाठी लेखक आणि दिग्दर्शकांनी एक अभिनव तंत्र वापरलं आहे. प्रत्येक प्रमुख पात्राचा दिवस आपल्याला जवळून बघायला मिळतो. प्रत्येकाचा दिवस जवळून पाहिला तर तुकोबांच्या 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ओळी आठवतात. प्रत्येक दिवशी त्याला किंवा तिला अनेक छोट्या-छोट्या लढाया कराव्या लागतात आणि या प्रत्येक लढाईत मूल्यांची कसोटी लागते. एकीकडे अण्णांचं देशव्यापी आंदोलन चालू असताना साधा गॅस मिळवण्यासाठी गृहीणीला ज्या खटपटी कराव्या लागतात त्यातून भ्रष्टाचाराचं आपल्या देशातलं रूप किती खोलवर पसरलं आहे याची जाणीव होते. कथा उलगडत जाताना लोक दोन पातळ्यांवर आयुष्य जगताना दिसतात. एकीकडे अण्णा जे म्हणतात ते आतून पटतही असतं, पण मूल्याधिष्टीत आयुष्याचा खडतर मार्ग पत्करायची तयारीही नसते, आपण जी तडजोड करतो आहोत तिच्याबद्दल अपराधीपणाही वाटत असतो. अशा अनेक कात्र्यांमध्ये सापडलेलं सुखात्मे कुटुंब हे आजच्या मध्यमवर्गीय समाजाचं प्रतीक ठरावं. चित्रपटात फक्त सुखात्मेच नाही तर त्यांच्या आयुष्याला स्पर्श करणार्या समाजाच्या विविध स्तरातील लोकांचं दर्शन होतं.
मूल्यांशी तडजोडीच्या अनुषंगाने चित्रपटात आणखी एक मुद्दा येतो. हा मुद्दा भ्रष्टाचाराच्या मुद्याइतका ठळकपणे मांडलेला नाही. आपण 'चलता है' च्या नावाखाली मूल्यांशी जी तडजोड करत असतो ती सरकारी कामे वगळता आपल्या इतर व्यवहारांमध्येही झिरपते का? 'देशाशी प्रामाणिक राहणे' या मूल्यामध्ये सवलत घेतली तर हळूहळू इतरांशी प्रामाणिक राहण्यातही आपण दिरंगाई करायला लागतो का? आणि असं होत गेलं तर ही मूल्यांची ढासळणारी उतरंड कुठे थांबेल का? '
द पॉवर ऑफ हॅबिट' नावाचं एक पुस्तक नुकतंच वाचनात आलं. यात हाच मुद्दा उलट्या बाजूने मांडला आहे. आपण आयुष्यातील एका भागाला चांगल्या सवयी लावून घेतल्या तर हळूहळू त्यांचा परिणाम इतर भागांमध्येही होतो.
चित्रपटाच्या शेवटी येणार्या एका दृश्यानं अपेक्षेपेक्षा जास्त वेळ विचारात गुंतवून ठेवलं. आंदोलन संपल्यानंतर टिव्हीवर आंदोलक राष्ट्रगीत म्हणत असताना सुखात्मे कुटुंब उभा राहून मानवंदना देतं. अशा वेळी प्रेक्षकांनी काय करावं असा प्रश्न पडतो. चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्र्गीत चालू असताना आपण उभे राहिल्याची आठवण ताजी असते त्यामुळे आता आपण बसलो आहोत ही भावना अधिक टोचते. इथे मुळात सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत दाखवण्यामागची कारणमीमांसा काय असा मूलभूत प्रश्न पडतोच. शिवाय चित्रपटात राष्ट्रगीत चाललेलं असताना ते काल्पनिक मानायचं की खरं असाही आणखी अवघड पेच पडतो. याचं उत्तर मिळवण्यासाठी कदाचित नाट्यसंहितेमधील '
चौथ्या भिंतीच्या' अनुषंगाने विचार करावा लागेल. हा प्रश्न कदाचित लेखक-दिग्दर्शक यांना अपेक्षित नसेलही. पण सकस कलाकृतीचं हे एक वैशिष्ट्य आहे की तिचे निरनिराळे अर्थ वाचकांना किंवा प्रेक्षकांना उलगडत जातात.
बहुतेक चित्रपटांची मोठी बजेट ही अभिमानानं सांगण्याची गोष्ट असते मात्र 'हा भारत माझा'च्या बाबतीत दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी म्हटल्याप्रमाणे कमी बजेट हीच विशेषता होती. सुमित्रा भावे यांनी पटकथा लिहिल्यानंतर विक्रम गोखले, उत्तर बावकर, जितेंद्र जोशी, रेणुका दफ्तरदार यांच्यासह सर्व कलाकारांनी मानधन न घेता काम केलं आणि चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य ओळखून चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं ही उल्लेखनीय बाब आहे.
आपण सिनेमा बर्याच कारणांसाठी बघतो. मनोरंजन हे त्यातलं महत्वाचं कारण. 'हा भारत माझा' ही एका प्रकारची परीक्षा आहे, आपणच विद्यार्थी आणि आपणच परीक्षक. आपण जगताना कोणती मूल्यं, कशी वापरतो यावरची. हे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे आहेत. प्रश्न सोपे नाहीत, उत्तरं लगेच मिळतील अशी खात्रीही नाही. पण या परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं हे ही तितकंच महत्वाचं आहे.
एक सुरेख सिनेमा बघण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली आणि
माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार.